वरुड भैरवनाथ यात्रेत विकासाचा निर्धार — पर्यटनवाढीसाठी केंद्राकडून निधी आणण्याचे अंकुश गोरे यांचे आश्वासन
वरुड येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य रथोत्सव सोहळ्यात अंकुश गोरे आणि भारती गोरे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. या वेळी त्यांनी वरुड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका मांडत पर्यटन, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आश्वासने दिली.

वरुड भैरवनाथ यात्रेत विकासाचा निर्धार — पर्यटनवाढीसाठी केंद्राकडून निधी आणण्याचे अंकुश गोरे यांचे आश्वास
प्रतिनिधी महेश यादव
औंध, ता.३:
वरुड येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य रथोत्सव सोहळ्यात अंकुश गोरे आणि भारती गोरे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. या वेळी त्यांनी वरुड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका मांडत पर्यटन, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आश्वासने दिली
कार्यक्रमात बोलताना अंकुश गोरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, वरुड सरोवर उपक्रम हा ग्रामस्थ, समन्वयक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेला एक आदर्श उपक्रम आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार असून, पर्यटनवाढीसाठी आवश्यक असलेला अंदाजे दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वरुड सरोवर हा उपक्रम केवळ औंध गटापुरता मर्यादित न राहता, येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. योग्य नियोजन, दर्जेदार विकासकामे आणि लोकसहभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प राज्यातील आदर्श पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना भारती गोरे यांनी सांगितले की, वरुड येथे प्रतिकास तलावाची आकर्षक प्रतिकृती साकारली असून, त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. औंध व वरुड परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड व परिसरातील विकासकामांसाठी नेहमीच कृतिशील पावले उचलली जातील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, पर्यटन विकास, युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण या सर्व बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
वरुड ग्रामस्थांच्या अडीअडचणी, सार्वजनिक समस्या आणि मूलभूत गरजा या स्वतःच्या समस्या मानून त्यावर प्रभावी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम केले जाईल, असेही उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले.
श्री भैरवनाथ रथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विकासाबाबत मांडण्यात आलेल्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत करत, वरुड गाव लवकरच पर्यटन व विकासाच्या क्षेत्रात नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.




